दत्तुची ओली भेळ

भेळ आपली रविवारची संध्याकाळ चटपटीत करते. मुबंईत तर चौपाटी आणि भेळ याचं अतुट नातं आहे. पण शहरी बाजाच्या भेळीं पासून जरा हटके, अस्सल रांगडी आणि चविष्ट भेळ म्हणजे ओतूरच्या दत्तूची ओली भेळ.

मुंबई नगर महामार्गावर असणाऱ्या ओतुर गावातील दत्तूची चटकदार ओली भेळ गावकऱ्यांसाठी भूषण ठरली आहे. गावात येणाऱ्या पाहुण्यांना ही ओली भेळ चाखवायला गावकरीही उत्सुक असतात. जवळपास ५० वर्षांचा इतिहास असलेल्या या भेळीने भौगलिक सीमा ओलांडून आपलं वैशिष्ट्य जपलं आहे.

मुरमुरे, त्यावर दोन प्रकारचे चिवडे, थोडी पापडी, कांदा, कोथींबर. त्यावर घट्ट चिंचेची चटणी आणि हिरव्या मिरच्यांची चटणी हे कॉबिनेशन तयार होत असतानाचा नजारा ही अनोखा. अगदी कलात्मकतेने हे मिश्रण तयार केले जाते. त्यामुळे समोर आलेल्या भेळीची चव खाणाऱ्यांच्या जीभेवर कायम रेंगाळते. विशेष म्हणजे मटकी, टोमॅटो, कैरी या कुबड्यांची या भेळीला कधी गरजच पडली नाही.

ओतुर गावात १९६० च्या सुमारास दत्तात्रय खेत्री यांनी सुरु केलेल्या, भेळीच्या गाडीचे रुपांतर आता ४ दुकानांमध्ये झाले आहे. दत्तात्रय खेत्री यांची तीन ही मुलं सुनील, राजेंद्र आणि मंगेश आज या व्यवसायात आहेत.

दिवसाला २०० ते ३०० ग्राहक या भेळीचा आस्वाद घेतात आणि इतकीच भेळ पार्सल ही नेली जाते. आठवडी बाजार यात्रा, उन्हाळा, दिवाळी आणि लग्नसराई या दिवसात तर ही तीनही दुकानं गर्दीने ओसांडून वाहात असतात.

शहरात भेळ हा संध्याकाळी खाल्ला जाणारा पदार्थ आहे, मात्र इथं दिवसभरात तुम्ही कधीही भेळीचा आस्वाद घेऊ शकता, कारण इथं येणारा प्रत्येक जण हा भेळीचा आनंद लुटण्यासाठी आलेला असतो.

मागणी प्रमाणे ही ओली भेळ पार्सल ही मिळते. पार्सलमध्ये चिंचेची आणि मिरचीची चटणी वेगळी पॅक करून दिली जाते. ओल्या भेळीबरोबर सुकी भेळ ही तितकीच चविष्ट. उत्तम प्रतिचा माल वापरल्यामुळे ही भेळ तीन आठवडे खराब होत नाही.

पुण्या, मुबंईचा चाकरमानी तसेच राज्यभरातून इथं शिकायला आलेले विद्यार्थी घरी जाताना द्त्तूची भेळ न्यायला विसरत नाही. परदेशात उच्च शिक्षणासाठी गेलेली मुलं तिथं ही दत्तुची भेळ मिस करतात.

म्हणूनच मुलांच्या हटटामुळे त्यांच्या पालकांना हा भेळीचा खाऊ परदेशी कूरीयर करावा लागतो. काळाच्या ओघात या व्यवसायात बदल झाले, असले तरी या भेळीच्या चवीत आणि गुणवत्तेत काडीमात्र फरक झालेला नाही.

Leave a Reply